शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०११

पत्रावर आलेल्या प्रतिक्रिया

माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रावर अद्याप कोणत्याही मंडळाची लेखी प्रतिक्रिया आली नसली तरी काहीजणांचे फोन मात्र येऊन गेले. पत्रात माझ्याच मोबाईलचा उल्लेख असल्याने मीच सर्व फोन घेतले. या सर्वांशी जवळपास एकसारखाच संवाद झाला. परंतु अहमदनगर जिल्हा ढोर (वीरशैव कक्कय्या) समाज कर्मचारी संघाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब कटके यांची प्रतिक्रिया काहीशी वेगळी आणि सुखावणारी होती:

मी : हॅलो.
श्री. कटके : मधुकर सोनवणे बोलत आहेत का?
मी : हो. (मी नेहमी सुरवातीला 'हो'च म्हणतो. नंतर मात्र खरे सांगतो.) आपण कोण?
श्री. कटके : मी बाळासाहेब कटके. तुमचे पत्र मिळाले.
मी : अच्छा. अच्छा. बोला साहेब काय म्हणताय?
श्री. कटके : आपले पत्र मिळाले. खूप बरं वाटलं. बऱ्याच वर्षांनी मला असं पत्र कोणीतरी पाठवलंय. आजकाल कोणी एकमेकांना पत्र लिहित नाहीत. कोणी कोणाची विचारपूसही करत नाही. तुमचे पत्र वाचून फार आनंद झाला. (शब्दातही तेवढाच आनंद होता. त्यांची प्रतिक्रिया ऐकून मलाही आनंद झाला.)
मी : होय, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. 
(नंतर आम्ही १० मिनिटे बोलत राहिलो.)
मी : पत्राबद्दल काय विचार केला?
श्री. कटके : आजच पत्र मिळाले आहे. विचार करून सांगू. आमच्या २९ मेच्या मेळाव्याला जरूर या.
मी : नक्की येईन.

नंतर मेळाव्यात त्यांची भेट वडिलांशी घालून दिली. त्यावेळी बऱ्याच वेळा आमचे बोलणे झाले. परंतु पत्राचा विषय पुन्हा काही निघाला नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा